कविता शोध

माझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.

आता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)
मीऽच तो...
http://meechto.blogspot.com/


Friday, January 30, 2009

मनातल्या मनात मी...

मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो !
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो !

अशीच रोज नाहुनी
लपेट उन्ह कोवळे,
असेच चिंब केस तू
उन्हात सोड मोकळे;
तुझा सुगंध मात्र मी इथे हळूच हुंगतो !

अशीच रोज अंगणी
लवून वेच तू फुले,
असेच सांग लाजुनी
कळ्यांस गूज आपुले;
तुझ्या कळ्या, तुझी फुले इथे टिपून काढतो !

अजून तू अजाण ह्या
कुंवार कर्दळीपरी,
गडे विचार जाणत्या
जुईस एकदा तरी;
'दुरून कोण हा तुझा मरंद रोज चाखतो...?'

तसा न राहिला अता
उदास एकटेपणा,
तुझीच रूपपल्लवी
जिथे तिथे करी खुणा;
पहा कसा हवेत मी तुझ्यासवे सळाळतो !


कवी - सुरेश भट

Thursday, January 29, 2009

तव नयनांचे दल हलले गं...

तव नयनांचे दल हलले गं
पानावरच्या दवबिंदूपरी
जग सारे डळमळले गं
तव नयनांचे दल हलले गं

वारे गळले तारे ढळले
दिग्गज पंचाननसे वळले
गिरि ढासळले, सुर कोसळले
ऋषी मुनी योगी चळले गं
तव नयनांचे दल हलले गं

ऋतुचक्राचे आस उडाले
आकाशातुन शब्द उडाले
आवर आवर अपुले भाले
मीन जळी तळमळले गं
तव नयनांचे दल हलले गं

ह्रुदयी माझ्या चकमक झडली
दो नयनांची किमया घडली
नजर तुझी धरणीला भिडली
पुनरपी जग सावरले गं
तव नयनांचे दल हलले गं


कवी - बा. भ. बोरकर

Wednesday, January 28, 2009

ती...

नाही भेटलो मी दिवसभर तर
तीनं खुप बैचेन व्हावं,
संध्याकाळी ऑफ़िसबाहेर भेटून
मला अगदी सरप्राईज द्यावं

भेटण्यासाठी ठरलेल्या जागी
तीने माझ्या आधी यावं,
आणि मी उशिरा आलो म्हणुन
मग लटके लटकॆ रागवावं

फ़िरताना जर मी नजरेआड झालो
तर तीने कावरबावरं व्हावं,
आणि मी दिसल्यावर मात्र
अश्रू लपवत मला प्रेमान ओरडावं

माझं काही चुकलं तर
तीनं कधीही न रागवावं,
अबोला धरुन मला न रडवता
काय चुकलं ते समजवावं

जीची कल्पनाही केली इतकी
भरभरुन प्रेम देणारी ती व्यक्ती असावी,
माझी आठवण आली तीला की
तिनंही माझ्यासाठी एक कविता लिहावी...


कवी - विजय कुदळ

Friday, January 23, 2009

चल उठ रे मुकुंदा, झाली पहाट झाली

चल उठ रे मुकुंदा, झाली पहाट झाली
बाहेर चांदण्याला हलकेच जाग आली

मंदावला कधीचा गगनात शुक्रतारा
अन्‌ चोरपावलांनी आला पहाटवारा
गालांवरी उषेच्या आली हळूच लाली

घे आवरून आता स्वप्नांतला पसारा
बेचैन गोकुळाने केला तुझा पुकारा
तव गीत गात सारी ही पाखरे उडाली

तुज दूर हाक मारी कालिंदिचा किनारा
कुंजांतल्या फुलांनी केला तुला इशारा
तुज शोधण्यास वेडी राधा पुन्हा निघाली


कवी - सुरेश भट

Thursday, January 22, 2009

जयहिंद आणि जयजवान

ऐसे नव्हे की भारती या बुद्ध नुसता जन्मला,
नुसताच नाही बुद्ध येथे आहे शिवाजी जन्मला

विरतेची भारती या ना कमी झाली कधी,
आमचा इतिहास नुसता इतिहास ना झाला कधी

तीच आहे हौस आम्हा व्हावया समरी शहीद,
बाजी प्रभूही आज आहे आज तो अब्दुल हमीद

बोलला इतुकेच अंती आगे बढो आगे बढो,
देउन गेला मंत्र जसा आगे बढो आगे बढो

धर्माहुनी श्रेष्ठ आपल्या देशास जो या समजला,
मानु आम्ही त्यालाच आहे धर्म काही समजला

जन्मला जो जो इथे तो वीर आहे जन्मला,
अध्यात्म ही या भारताच्या युद्धात आहे जन्मला

कुठला अरे हा पाक याचे नावही नव्हते कुठे,
कळणारही नाही म्हणावे होता कुठे गेला कुठे

हे म्हणे लढणार यांच्या दाढ्या मिश्या नुसत्या बघा,
पाहिली नसतील जर का बुजगावणी यांना बघा

पाहण्याला सैन्य त्यांचे जेव्हा आम्ही गेलो तिथे,
नव्हते कोणीच होते फ़क्त पैजामे तिथे

आहे ध्वजा नक्कीच आमुची पिंडीवरी लहरायची,
फ़क्त आहे देर त्यांनी समरी पुन्हा उतरायची

हाच आहे ध्यास आता अन्य ना बोलू आम्ही,
बोलु आम्ही जयहिंद आणि जयजवान बोलू आम्ही


कवी - भाऊसाहेब पाटणकर

Wednesday, January 21, 2009

लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती

अखेरचे येतिल माझ्या हेच शब्द ओठी
लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती

इथे सुरु होण्याआधी संपते कहाणी
साक्षीला केवळ उरते डोळ्यांतिल पाणी
जखम उरी होते ज्यांच्या तेच गीत गाती

सर्व बंध तोडुनि जेव्हा नदी धुंद धावे
मीलन वा मरण पुढे हे तिला नसे ठावे
एकदाच आभाळाला अशी भिडे माती

गंध दूर ज्याचा आणिक जवळ मात्र काटे
असे फूल प्रीती म्हणजे कधी हाय वाटे
तरी गंध धुंडित धावे जीव तुझ्यासाठी

आर्त गीत आले जर हे कधी तुझ्या कानी
गूज अंतरीचे कथिले तुला या स्वरांनी
डोळ्यांतुन माझ्यासाठी लाव दोन ज्योती

कवी - मंगेश पाडगावकर

Tuesday, January 20, 2009

दुःख घराला आले

अंधार असा घनभारी
चंद्रातुन चंद्र बुडाले
स्मरणाचा उत्सव जागून
जणु दुःख घराला आले

दाराशी मी बसलेला
दुःखावर डोळे पसरुन
क्षितिज जसे धरणीला
श्वासानी धरते उचलुन

विश्रब्ध किनारे दूर
जाऊन कुठे मिळताती
जणु ह्रिदयामागुन माझ्या
झाडांची पाने गळती

नाहीच कुणी अपुले रे
प्राणांवर नभ धरणारे
दिक्काल धुक्याच्या वेळी
हृदयाला स्पंदविणारे


कवी - ग्रेस

Monday, January 19, 2009

पाठ

सोडताना प्राण त्यांना मी कुठे बोलावले?
खातरी झाली न त्यांची... ते घरी डोकावले!

हा कसा झिम्मा विजांशी ओठ माझे खेळती...
कोणते आकाश माझ्या अंतरी पान्हावले?

ऐकली आजन्म त्यांची मी शिळी रामायणे
(शेवटी मी बोललो अन् ते किती रागावले!)

मी न स्वप्नांचे कधीही मान्य केले मागणे
दुःख माझे एकट्याचे मी कधी लाडावले?

जीवना रे, एकदाही मी न टाहो फोडला
पाहणाऱ्यांचेच डोळे शेवटी पाणावले!

वेचण्या जेव्हा निघालो माणसांची आसवे
माझियामागे भिकारी शब्द सारे धावले!

वार झेलायास केली मी खुली छाती जरी
नेमके पाठीस माझ्या चावणारे चावले!


गझलकार - सुरेश भट

Friday, January 16, 2009

सर्वस्व तुजला वाहुनी

सर्वस्व तुजला वाहुनी, माझ्या घरी मी पाहुणी
सांगू कसे सारे तुला, सांगू कसे रे याहुनी?

घरदार येते खावया, नसते स्मृतींना का दया ?
अंधार होतो बोलका, वेड्यापिशा स्वप्नांतुनी

माझ्या सभोती घालते, माझ्या जगाची भिंत मी
ठरते परी ती काच रे, दिसतोस मजला त्यातुनी

संसार मी करिते मुका, दाबून माझा हुंदका
दररोज मी जाते सती, आज्ञा तुझी ती मानुनी

वहिवाटलेली वाट ती, मी काटते दररोज रे
अन्‌ प्राक्तनावर रेलते, छाती तुझी ती मानुनी


कवी - विंदा करंदीकर

Thursday, January 15, 2009

उपकार

एक जन्म पुरतोय ईश्वरा नको तुझे उपकार पुन्हा
खूप तुझे कर्तुत्व पाहिले नको नवे अवतार पुन्हा

खोल तुझ्या बाणाचा पल्ला माझ्या हळव्या हॄदयाशी
सावज असुनी सुसखाअन्त होता कोसळतो प्रतिकार पुन्हा

एके काळी होतो राजा शब्दगणांच्या राज्याचा
कंगालांचा भरतो आहे आजकाल दरबार पुन्हा

सूडाने मी विरोधातल्या पक्षाला मतदान दिले
हातोहात कसे सावरले निलाजरे सरकार पुन्हा

दासबोध वाचून उघडले घर मी सगळ्यांच्यासाठी
आता रचतो आहे माझे रस्त्यावर घरदार पुन्हा

गहाणही सर्वस्व ठेवले सुखशांतीच्या पेढीवर
जमले तर आल्या बाजारी स्वतःसही विकणार पुन्हा

देवदूत अन अतिरेक्यांच्या मधुचंद्राची गोची का
मध्यस्थी माणूस मरावा , सावरेल संसार पुन्हा


गझलकार - सुरेश भट

Wednesday, January 14, 2009

कुंभारासारखा गुरू नाही रे जगात

कुंभारासारखा गुरू नाही रे जगात
वरी घालितो धपाटा, आत आधाराला हात

आधी तुडवी तुडवी मग हाते कुरवाळी
ओल्या मातीच्या गोळ्याला येई आकृती वेगळी
घट जाती थोराघरी, घट जाती राऊळात

कुणी चढून बसतो गावगौरीच्या मस्तकी
कुणी मद्यपात्र होतो रावराजांच्या हस्तकी
आव्यातली आग नाही पुन्हा आठवत

कुणी पुजेचा कलश, कुणी गोरसाचा माठ
देता आकार गुरूने ज्याची त्याला लाभे वाट
घट पावती प्रतिष्ठा गुरू राहतो अज्ञात


कवी - ग. दि. माडगूळकर

Tuesday, January 13, 2009

केळीचे सुकले बाग...

केळीचे सुकले बाग, असुनिया पाणी
कोमेजलि कवळी पाने, असुनि निगराणी

अशी कुठे लागली आग, जळति जसे वारे
कुठे तरी पेटला वणवा, भडके बन सारे

किती दूरचि लागे झळ, आंतल्या जीवा
गाभ्यातिल जीवनरस, सुकत ओलावा

किती जरी घातले पाणी, सावली केली
केळीचे सुकले प्राण, बघुनि भवताली


कवी - अनिल

Monday, January 12, 2009

ऐसि शायरी माझी नव्हे

सांगेल काही भव्य, ऐसि शायरी माझी नव्हे
तो कविंचा मान, तितुकी पायरी माझी नव्हे

आम्ही अरे साध्याच, अपुल्या जीवना सन्मानितो
सन्मानितो हासू, तसे या आसवा सन्मानितो

जाणतो अंति ,अम्हाला मातीच आहे व्हायचे
नाहीतरी दुनियेत, दुसरे काय असते व्हायचे

मानतो देवासही, ना मानतो ऐसे नव्हे
मानतो इतुकेच की, तो आमुचा कोणी नव्हे

आहो असे बेधुंद, आमुची धुंदही साधी नव्हे
मेलो तरी वाटेल मेला, दुसरा कुणी आम्ही नव्हे


कवी - भाऊसाहेब पाटणकर

Friday, January 9, 2009

सूर मागू तुला मी कसा?

सूर मागू तुला मी कसा?
जीवना तू तसा, मी असा.

तू मला, मी तुला पाहिले
एकमेकांस न्याहाळिले
दुःख माझा तुझा आरसा

एकदाही मनासारखा
तू न झालास माझा सखा
खेळलो खेळ झाला जसा

खूप झाले तुझे बोलणे
खूप झाले तुझे कोपणे
मी तरीही जसाच्या तसा

रंग सारे तुझे झेलुनी
शाप सारे तुझे घेउनी
हिंडतो मीच वेडपिसा

काय मागून काही मिळे ?
का तुला गीत माझे कळे ?
व्यर्थ हा अमृताचा वसा


कवी - सुरेश भट

Thursday, January 8, 2009

पत्ते

मारतो राजास एक्का, नहिल्यास दहीला मारतो
कल्पनेचे खेळ सारे, कोणी कुणा ना मारतो

पाहता कोणात काही नाही कुठेही वेगळे
सारेच तुकडे कागदाचे, छाप नुसते वेगळे

आता जरासा रंग काही खेळास येऊ लागला
पत्यातला राजा स्वतःला राजाच मानू लागला

राणीसही जाणिव काही और होऊ लागली
लाजलि नव्हती कधी ती आज लाजू लागली

दिनतेचा खेद आता दुर्रीस होऊ लागला
पंजा म्हणे चौर्र्यास आता श्रीमंत वाटु लागला

विसरून निजरुप नुसत्या नामरुपी गुंतले
भलत्याच कुठल्या अवदसेच्या पाषात आता गुंतले

नुसता उपाधी भेद कोणी राजा नव्हे राणी नव्हे
आणखी सांगु पुढे तो खेळही अमुचा नव्हे

खेळतो दुसराच, त्याला पाहिले नाही कुणी
म्हणती तयाला इश,म्हणति अल्ला कुणी, येशू कुणी

त्याचा म्हणे हा खेळ, नुसते पत्ते आम्ही पत्यातले
एका परि पत्त्यास कळले मर्म हे पत्यातले

आहे इथे रंगेल कोणी पत्ता असा पत्यातला
आहे जरी पत्यातला तो नाही तसा पत्यातला

नामरूपाचा सतःच्या पत्ताच ना त्याला कधी
ना कशाची खंत होतो राजा कधी, दुर्री कधी

हासतो नुसताच आहे सर्वाहुनी हा वेगळा
आणखी सांगाल काहो वेदांत कोणी वेगळा


कवी - भाऊसाहेब पाटणकर

Wednesday, January 7, 2009

रोपटे

काय जे समजायचे ते शेवटी समजून गेलो,
मी तुझ्या आशेत सारी जिंदगी उधळून गेलो

चारचौघांसारखे मज बोलणे जमलेच नाही,
सांग तू आता शहाण्या, काय मी बरळून गेलो?

मी अता घेणार नाही माप श्वासांच्या गजांचे...
जन्मठेपेतून माझ्या आज मी निसटून गेलो.

का तुम्ही ठेवाल माझी याद येणाऱ्या पिढ्यांनो?
मी तुम्हासाठीच तेव्हा कोरडा बहरून गेलो

आज कैशी आपुली ही भेट ताटातूट झाली?
भेटतांना ऐन वेळी मी कुठे हरवून गेलो?

मी चुका केल्या तरीही काय हे नाही पुरेसे?
मी करोडो माणसांची अंतरे उजळून गेलो

जाणते ही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला-
मी इथे हे अमृताचे रोपटे रुजवून गेलो।


गझलकार - सुरेश भट

Tuesday, January 6, 2009

आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले ?

आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले ?
माझ्या धुळीचे शेवटी येथे किती कण राहिले?

ह्रदयात विझला चंद्रमा... नयनी न उरल्या तारका...
नाही म्हणायाला तुझे हे आपुलेपण राहिले

अजुनी कुणास्तव तेवतो हा मंद प्राणाचा दिवा?
अजुनी मला फसवायला हे कुठले निमंत्रण राहिले?

ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे ...
मी मात्र थांबुन पाहतो मागे कितीजण राहिले?

कवटाळुनी बसले मज दाही दिशांचे हुंदके
माझे अता दु : खासवे काही न भांडण राहिले!

होता न साधा एवढा जो शब्द मी तुजला दिला
एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले.

अवघ्या विजा मी झेलल्या, सगळी उन्हे मी सोसली
रे बोल आकाशा, तुझे आता किती पण राहिले?

ओसाड माझे घर मुळी नाही बघायासारखे
हे आसवांचे तेवढे अध्याप तोरण राहिले.


गझलकार - सुरेश भट

Monday, January 5, 2009

आज अचानक गाठ पडे

भलत्या वेळी भलत्या मेळी
असता मन भलतीचकडे

नयन वळविता सहज कुठेतरि
एकाएकी तूच पुढे

नसता मनिमानसी अशी ही
अवचित दृष्टिस दृष्ट भिडे

दचकुनि जागत जीव नीजेतच
क्षणभर अंतरपट उघडे

गूढ खूण तव कळुन नाकळुन
भांबावुन मागे मुरडे

निसटुनि जाई संधीचा क्षण
सदा असा संकोच नडे


कवी - अनिल

Friday, January 2, 2009

समिधाच सख्या या...

दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता
वाहते जिच्यातुनि त्याची जीवन-सरिता,
खळखळे, अडथळे, सुके, कधी फेसाळे
परि अखंड शोधे वाट समुद्राकरिता ||

खडकाळ प्रान्त तो ही जेथून निघाली
पथ शोधित आली रानातून अकेली,
नच रम्य राउळे, कलापूर्ण वा घाट
तीरावर तुरळक परि अंकुरती वेली ||

नव पर्णाच्या या विरल माण्डवाखाली,
होईल सावली कुणा, कुणास कहाली,
तोषेल कुणी, शापील कुणी दुर्वास,
"या जळोत समिधा-भव्य हवी वृक्षाली !"

समिधाच सख्या या, त्यात कसा ओलावा,
कोठून फुलापरि वा मकरन्द मिळावा?
जात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा,
तव आंतर अग्नी क्षणभर तरि फुलवावा ||


कवी - कुसुमाग्रज