कविता शोध

माझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.

आता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)
मीऽच तो...
http://meechto.blogspot.com/


Wednesday, December 31, 2008

कधीकधी...

मी एकटीच माझी असते कधीकधी
गर्दीत भोवतीच्या नसते कधीकधी

येथे न ओळखीचे कोणीच राहिले
होतात भास मजला नुसते कधीकधी

जपते मनात माझ्या एकेक हुंदका
लपवीत आसवे मी हसते कधीकधी

मागेच मी कधीची हरपून बैसले
आता नकोनकोशी दिसते कधीकधी

जखमा बुजून गेल्या साऱ्या जुन्या तरी
उसवीत जीवनाला बसते कधीकधी


गझलकार - सुरेश भट

Tuesday, December 30, 2008

बरं झालं...

या जमिनीत
एकदा स्वतःला गाडून घेईन म्हणतो...
चारदोन पावसाळे बरसून गेले
की रानातलं झाड बनून
परत एकदा बाहेर येईन...
म्हणजे मग माझ्या झाडावरच्या
पानापानांतून, देठादेठावर,
फांदीफांदीलाच मीच असेन...
येणारे जाणारे क्षण्भर थबकून,
सुस्कारत म्हणतील -
"बरं झालं हे झाड आलं
अगदीच काही नसण्यापेक्षा..."

आणि पानापानांतून माझे चेहरे
त्यांना नकळत न्याहाळत खुदकन् हसतील...
माझ्या पानांतून वाट काढणार्‍या सूर्यकिरणांबरोबर
माझं हसू आणि झुळूकश्वास
माझ्या सावलीतल्या लोकांवर पसरून देईन...
त्यांच्या घामाचे ओघळ
माझ्या सावलीत सुकताना हळूच म्हणेन -
"बरं झालं हे झाड आलं
अगदीच काही नसण्यापेक्षा...!"

माझ्या अंगाखांद्यांवर
आत्तापर्यंत हूल देणारी ती स्वप्निल पाखरं
आता त्यांच्याही नकळत माझ्या अंगाखांद्यांवर झोके घेतील...
त्यांची वसंतांची गाणी
उडत माझ्या कानी येतील...
ती म्हणतील -
"बरं झालं हे झाड आलं...
नाहीतर सगळा रखरखाटच होता !
याच जागी आपल्या मागे लागलेला
तो वेडा कवी कुठे गेला ?"
मी पानं सळसळवत कुजबुजीन -
"बरं झालं मी झाड झालो...
वेडा कवी होण्यापेक्षा"

आणखी काही वर्षांनी
मी सापडतच नसल्याचा शोध
कदाचित, कुणाला तरी लागेलही...
एखाद्या बेवारस, कुठल्याही
पण आनंदी चेहर्‍याच्या शवापुढे
ते माझ्या नावाने अश्रु ढाळतील;
माझी वेडी गाणी आठवत
कोणी दोन थेंब अधिक टाकेल,
आणि...

माझ्या चितेच्या लाकडांसाठी
माझ्याचभोवती गोळा होत
घाव टाकता टाकता ते म्हणतील -
"बरं झालं हे झाड इथे आलं
अगदीच लांब जाण्यापेक्षा..."

माझ्यावरती 'कोणी मी'
जळून राख बनताना
धूर सोडत म्हणेन -
"बरं झालं मी झाड झालो
अगदीच कुजून मरण्यापेक्षा..."


कवी - संदीप खरे

Monday, December 29, 2008

माझ्या गोव्याच्या भूमीत

माझ्या गोव्याच्या भूमीत
गड्या नारळ मधाचे,
कड्या-कपाऱ्यां मधुन
घट फ़ुटती दुधाचे||

माझ्या गोव्याच्या भूमीत
आंब्या-फ़णसाची रास,
फ़ुली फ़ळांचे पाझर
फ़ळी फ़ुलांचे सुवास||

माझ्या गोव्याच्या भूमीत
वनश्रीची कारागिरी,
पाना-फ़ुलांची कुसर
पशु-पक्ष्यांच्या किनारी||

माझ्या गोव्याच्या भूमीत
उन्हाळ्यात खारा वारा,
पावसात दारापुढे
सोन्याचांदीच्या रे धारा||

माझ्या गोव्याच्या भूमीत
येते चांदणे माहेरा,
ओलावल्या लोचनांनी
भेटे आकाश सागरा||

माझ्या गोव्याच्या भूमीत
चाफ़ा पानाविण फ़ुले,
भोळा भाबडा शालीन
भाव शब्दाविण बोले||

माझ्या गोव्याच्या भूमीत
गडे साळीचा रे भात,
वाढी आईच्या मायेने
सोन-केवड्याचा हात||

माझ्या गोव्याच्या भूमीत
सागरात खेळे चांदी,
आतिथ्याची, अगत्याची
साऱ्या षडरसांची नांदी||


कवी - बा. भ. बोरकर

Wednesday, December 24, 2008

म्हणालो नाही...

तू गेलीस तेव्हा 'थांब' म्हणालो नाही
'का जाशी ?' ते ही 'सांग' म्हणालो नाही,
होतीस जरी बाजूस उभी तू माझ्या
'हे अंतर आहे लांब' म्हणालो नाही...

मज स्मरते ना ती वेळ कोणती होती
घन ओले का नजरच ओली होती,
निपटून काढता डोळ्यांमधले पाणी
'जा! फिटले सारे पांग!' म्हणालो नाही...

बोलून इथे थकले मौनाचे रावे
कोणास कळाले म्हणून तुज उमगावे!
असहाय्य लागला आतून वणवा सारा
पणा वणव्याला त्या आग म्हणालो नाही...

बघ अनोळख्यागत चंद्र टेकवून भाळी
ओलांडून गेलीस तू कवितेच्या ओळी,
तुज अन्य नको काही तर सोबत म्हणुनी
जा घेऊन माझा राग - म्हणालो नाही...

हे श्रेय न माझे! तुझेच देणे आहे!
मन माझे अजुनी नितळ शुभ्रसे आहे,
जो एकच उरला ठसा तुझ्या स्पर्शाचा
तो चंद्रावरचा डाग - म्हणालो नाही...


कवी - संदीप खरे

Tuesday, December 23, 2008

हसतील ना कुसूमे जरी...

हसतील ना कुसूमे जरी, ना जरी म्हणतील 'ये'
पाऊल ना टाकू तिथे, बाग ती अमुची नव्हे

भ्रमरा परी सौंदर्यवेडे आहो जरी ऐसे अम्ही
इश्कातही नाही हुठे भिक्षुकी केली अम्ही

खेळलो इश्कात आम्ही बेधुंद आम्ही खेळलो
लोळलो मस्तीत नाही पायी कूणाच्या लोळलो

अस्मिता इश्कात सा-या केव्हांच नाही विसरलो
आली तशीही वेळ तेव्हा इश्क सारा विसरलो

रडलो आम्ही इश्कात जेव्हा आम्हा रडावे वाटले
तेव्हा नव्हे इश्कास जेव्हा आम्ही रडावे वाटले

आसूवरी अधिकार हाही इश्कात ज्याला साधला
नुसताच नाही इश्क त्याला मो़क्ष आहे साधला

बर्बादिची दीक्षा जशी इश्कात आम्ही घेतली
इश्कही बर्बाद करण्या माघार नाही घेतली

ना रडू नुसतेच आम्ही हाय ना नुसते करु
आहो शिवाचे भक्त आम्ही हेही करु तेही करु

कवी - भाऊसाहेब पाटणकर

Monday, December 22, 2008

वादळवेडी...

वादळवेडी विस्मयकर ही दीर्घकुंतली जात...

कधी वणव्याच्या मुकुटावरती तुरा होऊनी फ़िरे
देवघरातील होते केव्हा मंद शांत फ़ुलवात

कधी पतीस्तव सती होऊनी सरणावरती चढे
कधी जारास्तव विश्व जाळूनी घुसते वनवासात

तीर्थरुप ही कधी वाहते अमल जान्हवीपरी
कधी खिडकीतूनी मांसल हिरव्या नजरेची बरसात

नागिण होऊनी कुठे टाकते कालकुटाच्या चुळा
कुठे प्रकटतो हिच्याच देही इश्वरतेचा हात

उषा होऊनी कधी करितसे प्रतिभेची लावणी
कधी शालूसम नेसून बसते ही अवसेची रात

हसणे रुसणे कधी दावते दवबिंदूची कुळी
कधी खडकावर कठोरतेने करी लीलया मात

ही रसरंगित करी सुगंधित जीवन म्हणती जया
हीच ठेविते फ़ुटकळ मरणे किनखापी बटव्यात


कवी - कुसुमाग्रज

Friday, December 19, 2008

प्रेम कर भिल्लासारखं...

पुरे झाले चंद्र-सुर्य, पुरे झाल्या तारा,
पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा
मोरासारखा छाती काढून उभा राहा,
जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा
सांग तिला, तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा.

शेवाळलेले शब्द आणिक यमक-छंद करतील काय?
डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनू बांधील काय?
उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत,
जास्तीत-जास्त बारा महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगीनचिठ्ठी आल्याशिवाय राहील काय?

म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ,
प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ

प्रेम म्हणजे वणवा होउन जाळत जाणं,
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहाणं

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,
मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं

शब्दांच्या या धुक्यामधे अडकु नकोस,
बुरूजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस

उधळून दे तुफ़ान सारं मनामधे साचलेलं,
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं!


कवी - कुसुमाग्रज

Thursday, December 18, 2008

उपदेश

सार्‍याच शंकांची अशी मागू नको तू उत्तरे
असतात शंकेखोर जे त्यांचे कधी झाले बरे?

वेड्या, शहाण्यासारखा तू खा शिळी ही भाकरी,
घाणेरड्या खोलीत ह्या शोधू नका आता घरे

बोंबा अशा मारू नको, त्यांना तुझी चिंता किती?
मागेच दुःखांची तुझ्या भरली तयांनी टेंडरे

तू मान वेदान्तापरी सारीच खोटी इंद्रिये,
पण जाण अपुले पोट तू ह्या इंद्रियामाजी खरे

जमणारही नाही तुला त्यांची तिकोनी संस्कृती;
रे, बायकोमागे तुझ्या लेंढार पोरांचे फिरे!

संभावितांना तू कधी सांगू नको स्वप्ने तुझी;
चोरोनिया नेतील ते बाबा तुझी ही लक्तरे

प्रस्थापितांचे बंड हे त्यांची प्रतिष्ठा वाढवी,
त्यांच्या तुताऱ्या वेगळ्या... हाती तुझ्या पोंगा उरे !


कवी - सुरेश भट

Wednesday, December 17, 2008

सारेच हे उमाळे...

सारेच हे उमाळे आधीच योजलेले
सारेच हे जिव्हाळे आधीच बेतलेले!

सांभाळतात सारे आपापली दुकाने;
माझेच हे दिवाळे काढून लोक गेले!

मी हा भिकारडा अन्‌ माझी भिकार दु:खे;
त्यांचे हुशार अश्रू आधीच गाजलेले!

माझी जगायची आहे कुठे तयारी ?
त्यांच्या नकोत युक्त्या जे जन्मताच मेले!

माझ्या शिळ्या भुकेची उष्टी कशास चर्चा?
जे घालतात भिक्षा तेही उभे भुकेले

आता कुणाकुणाचे मी घाव आठवावे?
येतात जे दिलासे तेही उगाळलेले!


गीत - सुरेश भट

Tuesday, December 16, 2008

बाळ जातो दूर देशा

बाळ जातो दूर देशा, मन गेले वेडावून
आज सकाळपासून

हात लागेना कामाला, वृत्ती होय वेड्यावाणी
डोळ्याचे ना खळे पाणी

आज दूध जिनसा नव्या, आणा ताजा भाजीपाला
माझ्या लाडक्या लेकाला

याच्या आवडीचे चार, करू सुंदर पदार्थ
काही देऊ बरोबर

त्याचे बघा ठेवीले का, नीट बांधून सामान
काही राहिले मागून

नको जाऊ आता बाळ, कुणा बाहेर भॆटाया
किती शिणवीसी काया

वाऱ्यासारखी धावते, वेळ भराभर कशी!
गाडी थांबेल दाराशी

पत्र धाड वेळोवेळी, जप आपुल्या जीवास
नाही मायेचे माणूस

ऊंच भरारी घेऊन, घार हिंडते आकाशी
चित्त तिचे पिलापाशी

बाळा, तुझ्याकडे माझा जीव तसाच लागेल
स्वप्नी तुलाच पाहील

बाळ जातो दूर देशा; देवा, येऊन ऊमाळा
लावी पदर डोळ्याला


कवी - गोपीनाथ

Monday, December 15, 2008

भास

संध्याकाळी किनाऱ्यावर एकाएकी झाला भास
कोण आलं... कोण गेलं? कोणीच नाही जवळपास?

कुठून आली... कुठे गेली? मी पाहिली एवढ खरं
अस येणं अस जाणं तिला दिसलं नाही बरं!

चुळबुळणाऱ्या लाटांचा जिना उतरत उतरत आली
रेतीवरती पाउलखुणा न ठेवता परत गेली

थांब थांब म्हणेस्तोवर कशी दिसेनाशी झाली
गुल्बाक्षीच्या मावळतीवर आली जास्वंदाची लाली!

पुस्तक मिटून ठेवल्यावरती चांगल का हे पुन्हा येणं?
तेव्हा वचन दिलं होतं पुढील जन्मी देईन देणं !

आयुष्याच्या क्षितीजावर अंधारात बुडले रंग
कशासाठी, कशासाठी आता असा तपोभंग?

समुद्राच्या लाटा झेलत जेव्हा दोघे भिजलो होतो
ओल्याचिंब देहांनीच पेटलो होतो, विझलो होतो!

आता असे कोरडे.. जसे जळण्यासाठी उत्सुक सरण
निमित्ताला ठिणगी हवी! एवढ्याकरता दिलं स्मरण?


कवी - वसंत बापट.

Friday, December 12, 2008

खरा तो एकचि धर्म...

खरा तो एकचि धर्म । जगाला प्रेम अर्पावे॥

जगी जे हीन अति पतित
जगी जे दीन पद-दलित
तया जाऊन उठवावे । जगाला प्रेम अर्पावे॥

सदा जे आर्त अति विकल
जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे । जगाला प्रेम अर्पावे॥

कुणा ना व्यर्थ शिणवावे
कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्ता बंधु मानावे । जगाला प्रेम अर्पावे॥

प्रभूची लेकरे सारी
तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे । जगाला प्रेम अर्पावे॥

असे हे सार धर्माचे
असे हे सार सत्याचे
परार्था प्राणही द्यावे । जगाला प्रेम अर्पावे॥


कवी - साने गुरुजी

Thursday, December 11, 2008

माझे मन तूझे झाले

माझे मन तूझे झाले
तुझे मन माझे झाले
माझे प्राण तूझे प्राण
उरले ना वेगळाले॥

मला लागे तुझी आस
तुला जडे माझा ध्यास
तुला मला चोहीकडे
माझे तूझे होती भास॥

माझ्यातून तू वाहसी
तुझ्यातही मी पाहसी
तूझ्यामाझ्यातले सारे
गुज माझ्यातुझ्यापाशी॥

तुझी माझी पटे खूण
तुझी माझी हीच धून
तूझे प्राण माझे प्राण
माझे मन तूझे मन॥


कवी - सुधीर मोघे

Wednesday, December 10, 2008

संथ निळे हे पाणी

संथ निळे हे पाणी
वर शुक्राचा तारा
कुरळ्या लहंरीमधुनी
शिळ घालतो वारा

दुर कमान पुलाची
एकलीच अंधारी
थरथरत्या पाण्याला
कसले गुपीत विचारी

भरुन काजव्याने हा
चमके पिंपळ सारा
स्तिमीत होऊनी तेथे
अवचित थबके वारा

किरकीर रात किड्यांची
निरवतेस किनारी
ओढ लागुनी छाया
थरथरते अंधारी

मध्येच क्षितीजावरुनी
विज लकाकुन जाई
अन ध्यानस्थ गिरी ही
उघडुनी लोचन पाही

हळुच चांदने ओले
थिबके पाणावरुनी
कसला क्षन सोनेरी
उमले प्राणामधुनी

संथ निळे हे पाणी
वर शुक्राचा तारा
दरवळला गंधाने
मओनाचा गाभारा


कवी - मंगेश पाडगावकर

Friday, December 5, 2008

नवलाख तळपती दीप विजेचे येथ...

नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात
परि स्मरते आणिक करते व्याकुळ केव्हा
त्या माजघरातिल मंद दिव्याची वात!

वाऱ्यावर येथिल रातराणि ही धुंद
टाकता उसासे, चरणचाल हो मंद
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
त्या परसामधला एकच तो निशिगंध!

हेलावे भवती सागर येथ अफाट
तीरावर श्रीमान इमारतींचा थाट
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
तो नदीकिनारा आणि भंगला घाट!

बेहोष चढे जलशांना येथिल रंग
रुणझुणता नूपुर जीव बने निःसंग
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
तो आर्त मला जो ऐकविलास अभंग!

लावण्यवतींचा लालस येथे विलास
मदिरेत माणकापरी तरारे फेस
परि स्मरती आणिक करती व्याकुळ केव्हा
ते उदास डोळे, त्यातिल करुण-विलास!


कवी - कुसुमाग्रज

Thursday, December 4, 2008

जाईन दूर गावा

तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा.

पाण्यांत ओंजळीच्या आला चुकून मीन
चमकून हो तसाच गाण्यांत अर्थ यावा

शिंपीत पावसाळी सर्वत्र या लकेरी
यावा अनाम पक्षी, स्पर्शू मलाच यावा.

देतां कुणी दुरून नक्षत्रसे इषारे
साराच आसमंत घननीळ होत जावा.

पेरून जात वाळा अंगावरी कुणी जो,
शेल्यापरी कुसुंबी वाऱ्यावरी वहावा.

तारांवरी पडावा केव्हा चुकून हात;
विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा.

तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा,
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा.

कवी - आरती प्रभू [ चिं. त्र्यं. खानोलकर]

Wednesday, December 3, 2008

दु:ख ना आनंदही

दु:ख ना आनंदही अन अंत ना आरंभही,
नाव आहे चाललेली कालही अन आजही.

मी तसा प्रत्यक्ष नाही, ना विदेशी मी जसा,
मी नव्हे की बिंब माझें, मी न माझा आरसा.

एकला मी नाहि जैसा, नाहि नाहि मी दुणा,
मी नव्हें स्वामीहि माझा, मी न माझा पाहुणा.

प्रश्न की उद्गार नाही, अधिक नाही वा उणा,
जीवनाला ऐल नाही, पैल, तैसा मध्य ना.

याद नाही, साद नाही, ना सखी वा सोबती,
नाद आहे या घड्याला अन घड्याच्या भोवती.

सांध्यछाया आणि काया जोडुनी यांचा दुवा
नाव आहे चाललेली, दूरची हाले हवा.

दु:ख ना आनंदही अन अंत ना आरंभही,
नाव आहे चाललेली कालही अन आजही.


कवी - आरती प्रभू [ चिं. त्र्यं. खानोलकर]

Tuesday, December 2, 2008

कुजबुज

डोळ्यांतल्या दिव्यांची का तेलवात झाली ?
दोघांतल्या गुजाची जाहीर बात झाली

मी डाव टाकला की तू फेकलेस जाळे ?
खेळात उभयतांची जिंकून मात झाली

आयुष्यरखरखाटा आच्छादलेस ऐसे
मध्यान्हिच्या उन्हाची पौर्णीम रात झाली

खुलली सुवर्णकांती अजुनी मदालसेची
हळदीत नाहली अन् सिंदूरस्नात झाली

जाता जवळ जरासा, रोमांचली नवोढा
धडधड अधीर, नूतन नवख्या उरात झाली

हाकी अरूण निर्दय वेगात रथ असा का
आरूढ ज्यावरी ही अरसिक प्रभात झाली ?

फुलुनी खुणावणारी होती फुलंही दोषी
अपकीर्ति पण अलीची रानावनात झाली

करता मिलिंद गुंजन अलगद मधास लुटतो
कुजबुज अशी फुलांची आपापसात झाली


कवी - मिलिंद फणसे